मंगला जोगळेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विस्मरण हा एक स्वाभाविक अनुभव आहे. आठवणीने टेबलावर ठेवलेली किल्ली अचानक गायब होणे, ऑफिसमधून येताना करायची म्हणून ठरवलेली गोष्ट पूर्ण विसरुन जाणे, एखाद्या माहीत असलेल्या चेहऱ्याचे नाव मेंदूला ताण देऊनही न आठवणे, असे प्रसंग सगळ्यांच्याच आयुष्यात घडतात. तेही अगदी पदोपदी. यातील काही प्रसंग छोटे असतात, काही मोठे, काही गंमतीशीर, काही गंभीर. बहुतेक सर्व नको तेव्हा घडणारे, त्रास देणारे, चिडचिड वाढवणारे, इतरांवर दोषारोप करायला लावणारे, तर काही अंतर्मुख करणारे. गेल्या आठ दिवसात तुमच्या आयुष्यात घडलेले अनुभव आठवा बरे जरा. प्रत्येकाचे अनुभव वेगळे.

आणखी वाचा : महिलांना व्हाईट डिस्चार्ज का होतो? जाणून घ्या किती दिवसापर्यंत डिस्चार्ज होणे सामान्य आहे

तरुण आणि मध्यमवयीनांमधले विस्मरण
विस्मरण हा लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला येणारा एक स्वाभाविक, नैसर्गिक अनुभव आहे. तरुण व मध्यमवयीनांच्या जीवनात घडणारे प्रसंग बहुविध असले, तरी गांभीर्याच्या दृष्टीने विचार केल्यास सहसा ते साधारण स्वरुपाचेच विस्मरण असते. महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारचे अनुभव येत राहिले, तरी आपल्याला ‘अल्झायमर्स’ वा ‘डिमेन्शिया’ झाला आहे किंवा होणार आहे, असा विचार कुणी मनात आणण्याची आवश्यकता नाही. जेव्हा विस्मरण तरुण वयामध्ये घडताना दिसते, तेव्हा विस्मरणाचा आजार हे त्याचे कारण असण्याची शक्यता जवळपास नसतेच.

आणखी वाचा : विस्मरणाचा आजार कसा ओळखावा?

विसरणेही महत्त्वाचेच!
विसरण्याच्या अनुभवाचा पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज नसते. अनावश्यक माहितीचा निचरा होणे हे आठवण राहाण्याइतकेच महत्त्वाचे आहे आणि तेदेखील मेंदूचेच काम. उदा. तुम्ही रेल्वेमधून प्रवास करता तेव्हा आजूबाजूला बसलेल्या लोकांचे चेहेरे, त्यांच्याशी झालेले संभाषण, त्यांचे वागणेबोलणे, सगळे आपला मेंदू टिपत असतो. ते सगळे चार, आठ दिवस लक्षात असते, पण कालांतराने आपण ते सर्व विसरुन जातो, कारण आपल्याला त्या माहितीचा काही उपयोग नसतो. म्हणूनच विस्मरण हासुध्दा मेंदूचा एक मोठा गुणधर्म आहे हे समजून घ्यायला हवे. जसे अडगळीचे सामान माळ्यावर टाकल्यावर त्याची आठवण आपण विसरुन जातो, त्याप्रमाणे ज्या माहितीचा आपल्याला उपयोग नसतो त्या आठवणी लांबच ठेवल्या जातात. शिवाय ज्याप्रमाणे विस्मरणाचे अनुभव येतात, त्याप्रमाणे मेंदूची कार्यक्षमता दाखवणारेही अनुभव येत असतात.

आणखी वाचा : काय आहे स्मृती मानधनाचा डाएट प्लान?

का घडते सर्वसाधारण विस्मरण?
बहुतेक सगळ्यांच्याच बाबतीत ताण, चित्त शांत नसणे आणि ‘रात्र थोडी सोंगे फार’ हीच विस्मरणाची कारणे असतात असे दिसून येते. ताणाबरोबर झोपही व्यवस्थित होत नसेल, तर अशा घटना हमखास घडणारच. विस्मरणाचे आणखी कारणे म्हणजे एकावेळी एकापेक्षा जास्त गोष्टी करणे आणि शिस्त कमी पडणे. निरीक्षणाचा अभाव हेदेखील एक महत्त्वाचे कारण.

आणखी वाचा : फोर मोअर शॉट्स – तिसऱ्या पर्वात महिलांची लैंगिकता, सेक्स आणि बरंच काही…

जीवनशैलीतील बदलांमुळे विस्मरण वाढतेय?
अलिकडे मध्यमवयीन गटामध्ये स्मरणशक्तीचे प्रश्न वाढताना दिसून येत आहेत. अभ्यास लक्षात राहात नाही अशी तक्रार विद्यार्थी करत आहेत. जीवनशैलीतील बदल हे सगळ्याच प्रश्नांमागचे कारण आहे का? आहार-विहारातील बदल, व्यायामाचा अभाव आणि वाढता तणाव हे आपले शत्रू आहेत का? हे सध्या तरी आपले आपण ठरवून त्यानुसार पावले उचलायची आहेत.
मित्र मैत्रिणींची साथ, एकत्र खेळणे, रेडिओ ऐकणे, वाचन, गाणी, गप्पांचे कट्टे इत्यादी आणि रिकामटेकडेपणसुद्धा, यांनी अविस्मरणीय अनुभव जुन्या पिढीच्या पदरी टाकले. त्यांच्यातले अभ्यासापाठीमागे अख्खा दिवस लागलेले किती असायचे? दिवसभर खेळण्यामुळे व्यायाम व्हायचा, भूक लागायची, झोप यायची, मोठ्या व्यक्तींचा आधार असायचा, मुळातच ताण कमी वाटायचा. आता हे सगळेच बदलले आहे.

आणखी वाचा : Ind vs Pak: प्रिय अनुष्का, थँक ‘यू’!

तरुणांनो, इकडे लक्ष द्या!
तरुणांमधील स्मरणशक्तीचे प्रश्न थोडेफार वाढत असल्याचे संशोधनात दिसून येत आहेत. ताण, अपुरी झोप आणि त्यामुळे मेंदूला न मिळणारी विश्रांती याचा उल्लेख वर आलाच आहे. ही स्थिती तात्पुरती असेल तर चांगलेच आहे. परंतु सातत्याने ताणाखाली काम करण्याचा परिणाम नैराश्यापर्यंत पोहोचला आहे का, हे बघणेही आवश्यक आहे. डिप्रेशन आणि स्मरणशक्ती यांचा एकमेकांशी संबंध आहे, ही आता सर्वमान्य बाब आहे. ब्लड प्रेशर, हृदयाच्या आरोग्याकडेही तरूणांनी लक्ष द्यायला हवे असेही संशोधनातून दिसते. म्हणूनच तरुणांच्या बाबतीत घडणाऱ्या अशा प्रसंगांकडे गांभीर्याने बघायला हवे. स्मरणशक्तीचे प्रश्न पाठपुरावा करत असतील तर वेळीच उपाययोजना करायला हव्यात, कारण पंधरा, वीस वर्षांनी पुढे जाऊन हे प्रश्न काय स्वरुप घेतील हे समजायला आपल्याकडे आताच पुरेशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे त्याबाबत सावधानता बाळगायला हवी.

आणखी वाचा : मासिक पाळीदरम्यान सेक्स? तर… हे नक्की वाचा

डेटा ओव्हरलोड!
आपल्याला असेही दिसते की, नवीन पिढी ‘डेटा-ओव्हरलोड’ची शिकार झाली आहे. वीस वर्षांपूर्वी जेवढी माहिती आपण मेंदूला पुरवत होतो त्यापेक्षा अनेक पटींनी माहिती आपण मेंदूला क्षणोक्षणी देतो. उदा. पूर्वी टेलिव्हिजनच्या एखाद्-दुसऱ्या वाहिनीवरचे कार्यक्रम आपण ठराविक वेळ बघायचो. त्याऐवजी आता आपण अनेक चॅनेल्सच्या कार्यक्रमांत दिवसभर रममाण होतो. सीरीयल्स नुसत्या चवीचवीने बघत नाही, तर सगळे लक्षातही ठेवतो. स्मार्ट फोन, कॉम्प्युटर, व्हिडीओ गेम्स, टॅबलेट, ओटीटी माध्यमे हे सगळे आहेतच. अभ्यास असो, जेवणखाण असो वा कोणाशी बोलणे असो, हातात कुठले तरी गॅजेट विराजमान असतेच. एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला गेलो तरी त्याचे फोटो काढण्यातच आपण गर्क असतो. जी गोष्ट करत असतो तिच्याकडे किती लक्ष दिले जाते हा विचार कोण करते? मग ती लक्षात राहिली नाही तर स्मरणशक्तीला दोष कसा द्यायचा?

आणखी वाचा : हिवाळा आला, आहाराची वेळ पाळा

स्मरणशक्तीचे प्रश्न साधारण साठीच्या पुढे वाढीला लागतात असे समजले जाते. जीवनशैलीतील बदलांमुळे हे वय अलिकडे सरकले आहे की काय अशी शंका घेतली जात आहे. करोनाच्या काळात सर्वांच्या बाबतीतच हे प्रश्न प्रकर्षाने पुढे येत आहेत. चाळिशीत, पन्नाशीत प्रश्नांची वाढ फार नाही हीच त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stressful lifestyle responsible for oblivion memory loss dementia health tips vp
Show comments