राधिका सध्या भारतीय लष्करात कार्यरत आहे. ती मूळची बायोटेक इंजीनीअर आहे. मुंबई आयआयटीमधून तिनं अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. आठ वर्षांपूर्वी लष्करात रुजू झालेल्या राझिकावर एक खूप मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मिशनअंतर्गत कांगो या देशात ती तैनात होती. रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये मोनुस्को (MONUSCO) म्हणजेच संयुक्त राष्ट्रांच्या शांतता प्रस्थापित करणाऱ्या मोहिमेअंतर्गत एंगेजमेंट प्लॅटून कमांडर म्हणून ती तैनात होती. तिच्या नेतृत्वात २० महिला आणि १० पुरुषांची फौज तिथे तैनात करण्यात आली होती. शांतता राखणं एवढंच या शांतता सेनेचं कार्य नसतं. तर त्याशिवाय तिथलं विस्कळीत झालेलं जनजीवन रुळावर आणणं, सुरळीत सुरू करणं हेही महत्त्वाचं काम शांतता सेना करते. कांगोमध्ये शांतता राखण्यात तर त्यांनी भूमिका बजावलीच. पण तिथलं जनजीवन परत रुळावर आणण्यासाठी तिनं भरपूर प्रयत्न केले. या प्रयत्नांचं फळ म्हणूनच तिचा संयुक्त राष्ट्राच्यावतीने गौरव करण्यात आला. कांगोमध्ये लोकांशी संवाद साधणं हे सगळ्यांत महत्त्वाचं काम होतं, ते राधिकाने अत्यंत प्रभावीपणे केलं. त्याशिवाय निर्वासितांच्या समस्या सोडवणं, संघर्ष क्षेत्रातील महिला आणि मुलांकडे विशेष लक्ष देणं, त्यांच्या समस्या ऐकून घेणं त्या सोडवण्याचा प्रयत्न करणं हीदेखील या फौजेची मुख्य कार्ये होती. महिला सुरक्षेसाठीही तिनं पुढाकार घेतला. पण राधिकाच्या नेतृत्वाखाली या फौजेने महिला आरोग्य, बालसंगोपन, लैंगिक समानता, शिक्षण, रोजगार अशा विषयांवर विविध सत्रे आयोजित केली. तिथल्या मुलांसाठी इंग्रजी बोलण्याचे विशेष क्लासेस घेतले. तरुणांसाठी कौशल्य विकास उपक्रम राबवले. लोकांना त्यामध्ये सहभागी करून घेतलं. त्यांचा आत्मविश्वास वाढवला. या सगळ्या प्रयत्नांसाठी राधिकाचा विशेष गौरव करण्यात आला. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटेनियो गुटरेस यांनीही तिचं विशेष कौतुक केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मूळची हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील आहे. तिथल्या सुंदरनगर परिसरात तिचं बालपण गेलं. तिचे वडील ओंकार सेन एनआयटी हमीरपूरमध्ये कार्यरत होते, तर आई निर्मला सेन चौहारवेली इथल्या कथोग हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक होती. राधिकानं तिलं शालेय शिक्षण सुंदरनगरच्या सेंट मेरी स्कूलमधून घेतलं. त्यानंतर पुढील शिक्षण चंदीगडमधील मांऊट कार्मेलमधून पूर्ण केलं. त्यानंतर तिनं बायोटेक्नॉलॉजीमध्ये बी. टेकची पदवी घेतली. खरं तर आयआयटीमधल्या पदवीनंतर राधिकाला गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणं सहज शक्य होतं. तिला वैज्ञानिक व्हायचं होतं. पण तिला लष्करात जावसंही वाटे. मोठ्या पगाराच्या नोकरीऐवजी तिनं देशसेवा करण्यासाठी लष्करात जाण्याचा पर्याय निवडला. लष्करात जाण्याचं आपल्या आजोबांचं स्वप्न होतं असं ती सांगते. २०१६ मध्ये तिनं लष्करात सेवा सुरू केली. त्यानंतर चेन्नईच्या ऑफिसर्स मिलिट्री अकादमीमध्ये तिनं प्रशिक्षण घेतलं. राधिकाचं पहिलंच पोस्टिंग श्रीनगरमध्ये होतं. त्यानंतर लेह, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही तिनं कर्तव्य बजावलं आहे. प्रचंड मेहनत घेण्याची तयारी आणि प्रामाणिकपणा, निष्ठा हे राधिकाचे गुणविशेष आहेत.

राधिकाला मिळालेला ‘मिलिट्री जेंटर ॲडव्होकेट ऑफ द इयर’ हा संयुक्त राष्ट्रातील एक सर्वोच्च सन्मान समजला जातो. सुरक्षा, शिक्षणासाठी तसंच लैंगिक असमानता नष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी राधिकानं विशेष कष्ट घेतले. लष्करात जाणं म्हणजे केवळ युद्ध करणं इतकंच नसतं. तर त्यापलीकडेही लष्करातील कार्यक्षेत्राच्या सीमा विस्तारलेल्या आहेत. फक्त तिथं जाण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास आणि हिंमत लागते. तसंच अविरत कष्ट घेण्याची तयारी. एक महिला लष्करी अधिकारी काय करू शकते हे राधिकानं दाखवून दिलं आहे. आयआयटी सारख्या प्रतिष्ठित संस्थेतून उच्च पदवी मिळाल्यानंतर ऐशारामात आयुष्य घालवणं तिला सहज शक्य होतं. पण त्याऐवजी तिनं देशसेवेचा जो पर्याय निवडला त्यामुळे कितीतरी तरूणींना नक्कीच प्रेरणा मिळाली असेल.