नोकरदार स्त्रियांना अनेकदा आपल्या मुलांना त्यांच्या आजी-आजोबांवर सोपवूनच कामाला जावं लागतं. अशावेळी मन मात्र मुलांभोवती घोटाळत राहातं. मग घरी सतत फोन करून आजी-आजोबांना सूचना दिल्या जातात. मात्र आपल्या सासूला मुलं सांभाळण्याचा अनुभव आपल्यापेक्षा जास्त आहे, आणि असे सतत फोन केल्याने त्यांचं मन नकळतपणे दुखावलं जाऊ शकतं. याचं भान त्यांना राहात नाही. ते राखायला हवं.

“ आई, पिंकीला गाडीवरून घेऊन जात आहात तर तिला स्कार्फ बांधून आणि फुल बाह्या असलेला स्वेट शर्ट घालून घेऊन जा, आणि नाकावर तिचा छोटा मास्क लावायला सांगा, थोडी जरी धूळ नाकात गेली तरी तिला लगेच सर्दी होते.”

हेही वाचा : उमा मणी… गृहिणी ते कोरल वुमनचा कलात्मक प्रवास

उर्मिलाने सासूबाईंना हा पाचवा फोन केला होता. पिंकीला त्या त्यांच्या भिशी पार्टीला घेऊन जाणार होत्या. त्यांच्या सर्व मैत्रिणी महिन्यातून एकदा एकीच्या घरी जमतात आणि भिशी, खाणे-पिणे,गप्पा अशा गमती जमती चालू असतात. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी हा कार्यक्रम ठरलेलाच असतो. त्या दिवशी उर्मिला आवर्जून घरी थांबते. एरव्ही त्या पिंकीचं सगळं बघतात, मग महिन्यातून एकदाच त्या मैत्रिणींना भेटायला जातात म्हणून ती आवर्जून त्यांना वेळ देते आणि घरातील सर्व गोष्टी पाहते,पण आज तिला ऑफिसमध्ये यावं लागलं होतं. लेखा तपासणीसाठी सर्व टीम हेड ऑफिस मधून आल्यानं सर्वांनाच आज ऑफिसमध्ये बोलावलं होतं.

विक्रांतही घरी नव्हता त्यामुळं आज सासुबाई पिंकीला घेऊन भिशीला निघाल्या होत्या. खरं तर त्यांनी आज जाऊच नये असं तिला वाटतं होतं. ‘जायलाच हवं का?’ असं तीन वेळा विचारून झालं होतं, पण त्यांची एक मैत्रीण कॅनडाला त्यांच्या मुलाकडे जायला निघाली होती आणि किमान सहा महिने तरी ती भेटणार नाही म्हणून त्यांना आज जायचंच होतं. ही भिशी पार्टी त्या कधीही चुकवायच्या नाहीत. त्यांना निवृत्त होऊन पाच वर्षं झाली होती, सर्वजणी एकत्र भेटल्या की त्यांनाही नवीन हुरूप यायचा, मैत्रिणीं एकमेकींशी सगळ्या गोष्टी शेअर करायच्या, म्हणूनच आज उर्मिला नसली तरी त्या पिंकीला घेऊन जाणार होत्या आणि उर्मिलेला पिंकीची काळजी वाटतं होती.

ऑफिसची कामं चालू होती. सर्व रजिस्टर पूर्ण करून तपासणीसाठी पाठवणं चालू होतं, पुन्हा तिला काहीतरी आठवलं, आणि तिने पुन्हा सासूबाईंना फोन लावला, परंतु तो बिझी लागत होता. ती पुन्हा पुन्हा डायल करण्याचा प्रयत्न करीत होती, अस्वस्थ होत होती. तिचं काय चाललं आहे, हे सर्व शेजारी बसणारी विशाखा बघत होती. उर्मिलेची अवस्था पाहून शेवटी ती म्हणालीच, “ अगं, पाच सहा फोन करून ‘पिंकीला कसं सांभाळायचं या सर्व सूचना सासूबाईंना देऊन झाल्या, आता अजून आणि काय राहिलं?’

“विशाखा, अगं त्या नेहमी पाण्याची बाटली विसरतात. पिंकीला बाहेरचं पाणी आम्ही देत नाही. तिला लगेच त्रास होतो. मी मघाशी त्यांना आठवण करून द्यायला विसरले म्हणून फोन लावत होते, तर आता त्यांचा फोन बिझी लागतो आहे.”

हेही वाचा : प्रवासी महिलांचे प्रश्न सोडविणाऱ्या लता अरगडे

विशाखाला हसूचं आलं,ती म्हणाली, “ऊर्मी, अगं त्या तुझ्या सासुबाई आहेत. पिंकीच्या आजी आहेत. तू रोज पिंकीला त्यांच्याकडे सोडूनच ऑफिसला येतेस. पिंकीला काय आवडतं? काय आवडत नाही हे तुझ्यापेक्षा त्यांना जास्त माहिती आहे. तिला कशामुळं त्रास होतो? तिची काळजी कशी घ्यायची? हे त्यांना माहिती आहे. प्रत्येक बारीक सारीक गोष्ट त्यांना का सांगते आहेस? “रोज पिंकी त्यांच्याबरोबर घरात असते. आज त्या तिला घेऊन त्यांच्या मैत्रिणीकडं जाणार आहेत. गप्पांच्या नादात त्यांचं दुर्लक्ष झालं तर? गाडीवरून जाताना तिला काही त्रास झाला तर? मला काळजी वाटते गं, म्हणून मी फोन करते आहे.”

“उर्मिला, पिंकी कोणत्याही तिऱ्हाईत माणसासोबत चाललेली नाही. ती पिंकीची आजी आहे आणि कोणतीही आजी आपल्या नातवंडांना दुधावरच्या सायी सारखं जपते. स्वतःला कितीही त्रास झाला, तरी ती नातवंडांसाठी सगळं करत असते. तुझ्या सासुबाई पिंकीची किती काळजी घेतात हे मी सुद्धा पाहिलं आहे. मग त्यांच्यावर विश्वास ठेवून तू निवांत का राहात नाहीस? पिंकीला काहीही झालं तरी त्या बघतील. तू उगाचच ओव्हर थँकिंग करतेस. त्यांच्या जागी जाऊन तू विचार करून बघ. तू सतत अशा सूचना दिल्यामुळं त्यांना काय वाटतं असेल? हा विचार कधी केलास का? त्यांनी नोकरी करून घर सांभाळलं. त्यांच्या दोन्ही मुलांना वाढवलं. त्यांच्याकडं अनुभव जास्त आहे मग पिंकीकडे त्या लक्ष देणार नाहीत का? तू असा अविश्वास दाखवलास तर पिंकीला सांभाळताना त्यांना एक अनामिक भीती वाटत राहील. ‘तिला काही झालं तर तू काय म्हणशील?’हे दडपण त्यांना सतत वाटत राहील. त्या मोकळेपणाने तिच्याशी वागू शकणार नाहीत. त्या पिंकीला सांभाळणाऱ्या बाई नाहीत, तर ती पिंकीची आजी आहे हे लक्षात घे. मुलीच्या काळजीपोटी फोन करतेस, असं सांगून तू त्यांच्यावर एक प्रकारचा अविश्वास दाखवते आहेस.त्यांच्याही मनाचा थोडा विचार कर.”

हेही वाचा : वनस्पती संवाद

विशाखा सांगत असताना उर्मिलेलाही हे जाणवलं की, आपण पिंकीची काळजी करत असताना नकळतपणे सासुबाईंवर अविश्वास दाखवत आहोत. खरं तर त्या आपल्यापेक्षा जास्त पिंकीकडं लक्ष देतात आणि पिंकीचंही आजीशिवाय पान हलत नाही. त्यांचं एकमेकींशी अतिशय उत्तम बॉंडिंग आहे. मी उगाचंच स्वतःला त्रास करून घेते आणि कारण नसताना अस्वस्थ होते आहे. माझ्या अशा वागण्यानं त्यांचं मन किती दुखावलं जात असेल याचा विचारही मी केला नव्हता. ती विशाखाला काहीच बोलली नाही, पण आपले डोळे उघडल्या बद्दल मनोमन तिचे आभार मानले. तेवढ्यात सासूबाईंचाच फोन आला. ती एवढंच म्हणाली
“आजीबाई आपल्या नातीबरोबर आजचा दिवस मस्त एन्जॉय करा. हॅव अ गुड डे.”
तिनं फोन ठेवला आणि तीही बिनधास्तपणे स्वतःच्या कामाला लागली.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smita joshi606@gmail.com)