Indian Diplomat Bhavika Mangalanandan : भारताच्या राजनैतिक अधिकारी भाविका मंगलानंदन यांनी शुक्रवारी पाकिस्तानेच पंतप्रधान शहबाज शरीफ यांना खडेबोल सुनावले. संयुक्त राष्ट्राच्या ७९ व्या सर्वसाधारण सभेत शहबाज शरीफ यांनी भारतात इस्लामोफोबिया वाढल्याचं सांगत टीका केली होती. या टीकेला मंगलानंदन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे पाकिस्तानला भरसभेत सुनावणाऱ्या भाविका मंगलानंदन नेमक्या कोण हे जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाविका मंगलानंदन या भारताच्या राजनैतिक अधिकारी आहेत. त्यांची संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांनी २०११ मध्ये इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली येथून पदवी प्राप्त केली आहे. तर, २०१५ मध्ये युपीएससी परीक्षा पास होऊन त्यांची निवड प्रीमिअर इंडियन फॉरेन सर्व्हिससाठी निवड झाली.

भाविका मंगलानंदन यांचं शिक्षण किती?

२००७-२००९ सालापर्यंत त्यांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये त्यांनी असिस्टंट सिस्टम इंजिनिअर म्हणून केलं. तर, २००९ ते २०११ या काळात त्यांनी आयआयटी दिल्लीमधून एनर्जी स्टडीजमध्ये स्पेशलायजेशन केलं. पदवी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी श्नायडर इलेक्ट्रिकमध्ये वरिष्ठ इंजिनिअर (मार्केटिंग) म्हणून केलं. २०१२ पर्यंत त्या या कंपनीत होत्या. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी युपीएससी परीक्षा पास केली. त्यामुळे प्रीमियर इंडियन फॉरेन सर्व्हिस (IFS) साठी त्यांची निवड झाली.

हेही वाचा >> India blasts Pakistan at UNGA: भारतात इस्लामोफोबिया वाढल्याचा पाकिस्तानचा आरोप; भारताने प्रत्युत्तर देताना म्हटले…

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताला कसं डिवचलं?

संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. आपल्या २० मिनिटांच्या भाषात त्यांनी भारताविरोधात गरळ ओकली. कलम ३७० पुन्हा लागू करून जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले. काश्मीरी जनतेच्या इच्छेनुसार आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा ठरवानुसार भारताने जम्मू आणि काश्मीरच्या समस्येवर शांततापूर्ण चर्चा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही शरीफ म्हणाले.

पॅलेस्टिनी आणि काश्मीरी लोक हे एकसारखेच असल्याचे सांगताना शरीफ म्हणाले की, पॅलेस्टाईनमधील जनता आणि जम्मू-काश्मीरच्या लोकांमध्ये काहीही फरक नाही. दोन्हीकडील नागरिक हे स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहेत. शाहबाज शरीफ पुढे म्हणाले की, भारतात मुस्लिमांना लक्ष्य केले जात आहे. तसेच इस्लामोफोबियामध्येही वाढ होत असून ही जगासाठी एक त्रासदायक बाब ठरत आहे. भारतात हिंदू वर्चस्ववादाचा अजेंड राबविला जात असून इस्लामोफोबियाचे हे सर्वात भयानक असे उदाहरण आहे. भारतातील २० कोटी मुस्लिमांना दमन करण्यात येत असून इस्लामिक वारसा नष्ट करण्याचा आक्रमक प्रयत्न होत आहे.

शरीफ यांच्या विधानांवर मंगलानंदन यांचं चोख प्रत्युत्तर

जो देश लष्कराकडून चालविला जातो. ज्यांना जागतिक पातळीवर दहशतवाद, अंमली पदार्थांचा व्यापार आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीसाठी ओळखले जाते, त्या देशाने जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर हल्ला करण्याचे धाडस केले आहे.आज या महासभेत खेदजनक बाब घडली असून आपण त्याचे साक्षीदार आहोत. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताचा उल्लेख केला, त्याबद्दल मी बोलत आहे. पाकिस्तान आपल्या शेजारी देशाच्या विरोधात सीमे पलीकडून दहशतवादाचा वापर करत आहे, हे जागाला माहिती आहे. त्यांनी आमच्या संसदेवर, आर्थिक राजधानी मुंबईवर, बाजार आणि तीर्थयात्रेच्या मार्गावर हल्ले केले. ही यादी बरीच मोठी आहे. अशा देशाने हिंसाचारावर बोलणे म्हणजे यापेक्षा मोठे दांभिकतेचे उदाहरण असू शकत नाही.”खरे सांगायचे तर पाकिस्तानला भारतीय भूभाग बळकविण्याची इच्छा आहे. त्यामुळेच भारताचा विभाज्य भाग असलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये लोकशाही मार्गाने होत असलेल्या निवडणुकांमध्ये दहशतवादाचा वापर करून सातत्याने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही भाविका मंगलानंदन म्हणाल्या. पुढे पाकिस्तानला इशारा देताना त्यांनी म्हटले की, शेजारी देशाने हेही लक्षात घेतले पाहीजे की, भारताविरुद्ध सीमेपलीकडून होणारा दहशतवाद हा अपरिहार्य परिणामांना आमंत्रण देईल.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is bhavika mangalanandan indian diplomat who schooled pakistan pm shehbaz sharif at unga chdc sgk
Show comments