– वनिता पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकत्याच काँग्रेसच्या काही महिला पदाधिकारी आणि हरियाणामधल्या महिला शेतकरी सोनिया गांधींना भेटायला गेल्या होत्या. गप्पागप्पांमध्ये त्या महिला शेतकरी सोनिया गांधी यांना म्हणाल्या, की आता राहुल गांधींचं लग्न करून टाका. त्यावर कुठलीही आई म्हणते, तसं सोनिया गांधीसुद्धा त्यांना म्हणाल्या, तुम्हीच शोधा आता त्याच्यासाठी मुलगी. (थोडक्यात मी तर शोधून आणि सांगून सांगून थकले. माझं काही ऐकत नाही हा मुलगा. ब्ला ब्ला ब्ला…)

कुठल्याही भारतीय घरात वय वाढलेला मुलगा किंवा मुलगी असली की होतो तसाच हा संवाद. राहुल गांधींचं सोडून देऊ, पण एरवी असं का होतं? लग्नाळू मुलगे किंवा मुली आईवडिलांना सांगतात, की आता मी लग्नाला तयार आहे, तेव्हा बघायला सुरुवात करा. मग आईवडील ओळखी पाळखीत आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न करायचं आहे, तेव्हा कुणी पाहण्यात असेल तर कळवा, असं सांगायला सुरुवात करतात. मॅरेज ब्युरोत जाऊन नाव नोंदवतात. तिथले पत्ते, फोन नंबर घेऊन कॉन्टॅक्ट करायला सुरुवात करतात. आईच्या पसंतीला एखादा मुलगा किंवा मुलगी उतरली, की मग बघण्याचा कार्यक्रम ठरतो. पुढे काय काय होतं ते आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. पण प्रश्न असा आहे, की राहुल गांधी असो की आणखी कोणी, त्यांच्या लग्नासाठी आईवडिलांनी कशाला जोडीदार शोधायला हवा? आपल्या आयुष्याचा जोडीदार ज्याला त्याला का शोधता येऊ नये?

हेही वाचा – नातेसंबंध- बॉयफ्रेंड ‘इंटिमेट’ होण्याचा आग्रह करतोय?

कुणीही लग्न करतो तेव्हा आपल्या आयुष्यात कुणाला तरी सामावून घेत असतो. दोघांची जात कोणती, उंची किती, रंग कसा, आर्थिक-सामाजिक स्थिती कशी यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट असते, त्यांची दोघांची मने जुळणे. ती जुळली तर इतर काहीही समान नसलं तरी काही फरक पडत नाही. आणि ही मने जुळण्यासाठी आवश्यक असते त्यांनी एकमेकांना समजून घेणं. ती गोष्ट आईवडील कशी करणार?

राहुल गांधींचं वय आहे पन्नासहून जास्त. त्यांना लग्न करायचं असेल तर त्यांची जोडीदार तेच शोधू शकतात. तेवढं वयानुसार शहाणपण त्यांच्याकडे आलेलं असणारच, पण तरीही ते लग्न करत नसतील, तर त्यांचं काहीतरी कारण असणार. पण तरीही इतर महिलांना वाटतं, की त्यांच्या आईने, सोनिया गांधी यांनी पुढाकार घेऊन राहुल गांधींचं लग्न लावून द्यायला हवं.

हेही वाचा – गच्चीवरची बाग: रूम डिव्हायडर्स

एरवीही सामान्य लोकांमध्ये अगदी पंचविशी आणि तिशीच्या आपल्या मुलांना जोडीदार मिळवून देण्यासाठी त्यांच्या आया खस्ता खात फिरतात, तेव्हा मोठी गम्मत वाटते. आपला जोडीदार त्यांना स्वतःला का शोधता येत नाही? अनेक मुलांची तर प्राथमिक अपेक्षा आपण लग्न करू त्या मुलीचं आणि आपल्या आईचं पटलं पाहिजे, अशी असते. मुलींना तर नवरा डॉक्टर इंजिनिअर हवा, त्याचं स्वतःचं घर हवं, तो सेटल हवा यापलीकडे अपेक्षा सांगताही येत नाहीत आणि असा नवरा आईवडिलांनी शोधून द्यावा असंच त्यांना वाटत असतं.

हे असे भारतीय तरुण तरुणी आपल्या कोशातून कधी बाहेर येणार? आणि आपला जोडीदार आपला आपणच कधी शोधणार? चुका होण्याची भीती वाटत असेल तर होऊ द्यात ना चुका. आयुष्य म्हणजे थोडेच गणित आहे की ज्याचं उत्तर परफेक्टच असलं पाहिजे? राहुल गांधी काही जोडीदार शोधण्यासाठी आईवर अवलंबून नाहीत हे उघड आहे, कारण तसं असतं तर त्यांचं लग्न केव्हाच झालं असतं…

तुम्हीही नका राहू आईवडिलांवर अवलंबून…

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why should sonia gandhi took initiative for rahul gandhi ssb
Show comments