Jammu Kashmir काश्मीरमध्ये आणि काश्मीरमधून होणाऱ्या महिला आणि लहान मुलांच्या तस्करीमध्ये गेल्या काही वर्षांत सुमारे १६ टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ १६ टक्क्यांचीच दिसत असली तरी ते हिमनगाचे टोकच असल्याची भीती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी स्वतःच थेट काश्मीरमध्येच व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : दिवास्वप्न का दिसतात?

काश्मीरमधील महिला आणि लहान मुलांच्या तस्करीकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने अलीकडेच काश्मीरमध्येच श्रीनगर येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत उपस्थितांशी संवाद साधताना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ही भीती बोलून दाखवली. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोकडे (एनसीआरबी) अद्ययावत माहिती उपलब्ध झाली आहे. या माहितीकडे व्यवस्थित लक्ष दिले तर काश्मीरमधे वाढलेला हा मोठा धोका सहज लक्षात येतो. काश्मीरमध्ये इतर राज्यांतून आणल्या जाणाऱ्या महिला आणि मुले तर काश्मीरबाहेर काश्मीरमधून नेल्या जाणाऱ्या काश्मीरी महिला आणि मुले अशी तस्करी दुतर्फा सुरू आहे. विविध तपास यंत्रणांकडून घेतलेल्या माहितीची छाननी केल्यानंतर असे लक्षात आले आहे की, केवळ नोंद झालेल्या गुन्ह्यांचीच आकडेवारी त्यांच्याकडे उपलब्ध आहे. प्रत्यक्षात तस्करीची ही प्रकरणे आणि आकडेवारी म्हणजे हिमनगाचे एक नवमांश इतके बाहेर दिसणारे केवळ टोकच ठरावे. हिच वस्तुस्थिती असेल तर आता ह्या समस्येने भीषण रूप धारण केले असून सर्व तपास यंत्रणांनी त्यांचे लक्ष याकडे केंद्रित करणे आवश्यक आहे, असेही शर्मा म्हणाल्या.

आणखी वाचा : Fashion ‘मिनी स्कर्ट’ची निर्माती मेरी क्वांट कोण होती?

काश्मीरमध्ये आणि काश्मीर बाहेर होणारी ही महिला आणि लहान मुलांची तस्करी वेळीच रोखण्यामधे काश्मिरी जनतेचा सहभाग सर्वाधिक महत्त्वाचा असणार आहे. म्हणूनच या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने थेट काश्मीरमध्येच कार्यशाळा घेण्याचा निर्णय घेतला. मानवी तस्करी हा गंभीर गुन्हा असून या गुन्ह्याला राज्य किंवा देशांच्या सीमारेखा नाहीत. काश्मीर ते कन्याकुमारी असे याचे क्षेत्र विस्तारलेले आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेकदा तस्करीला बळी पडलेल्या किंवा ज्यांची तस्करी होते त्या महिलांना आपण मानवी तस्करीला बळी पडलो आहोत याची जाणीवही नसते, असे सांगून रेखा शर्मा म्हणाल्या की, म्हणूनच या तस्करीविरोधात जनतेमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.

आणखी वाचा : गोल्डमन पुरस्काराने सन्मानित अलेस्सांड्रा कोरप मुंडुरूकु आहे तरी कोण?

राज्यात कार्यरत बिगर सरकारी संस्था (एनजीओ), स्थानिक जनता, विद्यार्थी या साऱ्यांना हाताशी धरून जनजागृती करणे आवश्यक आहे. अनेकदा चांगला रोजगार मिळण्याचे गाजर दाखवून ही तस्करी घडवून आणली जाते आणि त्यासाठी भारतातील अन्य राज्यांमध्ये काश्मीरमधील महिला आणि मुलांना नेले जाते. पण ही तस्करी काही एकतर्फी नाही. तर अलीकडे काश्मीरमध्ये होणाऱ्या तस्करीचाही मोठ्या प्रमाणावर उलगडा झाला आहे. हाती आलेल्या धक्कादायक माहितीनुसार इतर राज्यांतून नोकरीचे आमीष दाखवून महिलांना काश्मीरमधे आणले जाते. अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर महिलांची तस्करी पश्चिम बंगालमधून झाल्याचे लक्षात आले आहे. या महिलांना काश्मीरमधे नोकरीच्या आमिषाने आणल्यानंतर बळजबरीने त्यांच्याशी लग्न केले जाते आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचारही केले जातात. म्हणूनच राष्ट्रीय महिला आयोगाने याकडे केंद्राचेही लक्ष वेधले असून त्यासंदर्भात तातडीने पावले उचलण्याची विनंती केंद्राला रेखा शर्मा यांनी याप्रसंगी केली आहे. महिला आयोगाच्या धर्तीवर राज्यामध्ये वेगळी ‘आऊट ऑफ बॉक्स’ संकल्पना तस्करी रोखण्यासाठी लागू करता येऊ शकते काय आणि कशाप्रकारे यावर केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती शर्मा यांनी या प्रसंगी दिली.

दहशतवादाच्या भीतीमुळे काश्मीरमध्ये बाहेरून येणाऱ्यांची संख्या तशीही कमीच असल्याचा समज भारतामधे रूढ आहे. तसेच काश्मीरी जनता दहशतवादामुळेच बाहेर स्थलांतरित होत नाही, असाही एक समज आहे. मात्र नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या या प्रस्तुत आकडेवारीने मात्र दोन्ही समजांना छेद दिला असून या समस्येने धारण केलेले उग्र रूप उघड करण्याचे काम केले आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women and child trafficking from and into kashmir worrying trend vp