Sudan War : सुदानमध्ये एप्रिल २०२३ पासून अंतर्गत वादातून युद्ध सुरू आहे. परिणामी येथील नागरिकांचं जनजीवन इतकं विस्कळीत झालं आहे की, त्यांना दिवसाच्या दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत आहे. कुटुंबातील सदस्यांना दोन घास खाता यावेत म्हणून या देशातील महिलांना स्वतःच्या लज्जेच्या पलीकडे जाऊन इमान विकून कुटुंबाची गुजराण करावी लागतेय. लज्जा विकूनही त्यांना पोटभर अन्न मिळेल याची शाश्वती नाही. कारण यामुळे फक्त त्यांना खुलेआम चोरी करण्याची परवानगी मिळतेय. दी गार्डियन या वृत्तस्थळाने यासंदर्भातील सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला आहे.

युद्धग्रस्त सुदानच्या ओमदुरमन शहरातील महिलांना अन्नाच्या बदल्यात सैनिकांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जात आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे. दोन डझनहून अधिक स्त्रिया ओमदुरमनमधून पळून जाऊ शकल्या नाहीत. त्यामुळे रोजच्या जगण्यासाठी त्यांना सुदानी लष्करातील सैनिकांशी लैंगिक संबंध ठेवणे हा एकमेव मार्ग उरल्याचं यात म्हटलं आहे. ज्या शहरात सर्वाधिक अन्न पुरवठा केला जात होता त्याच फॅक्टरी एरियात बहुतांश हल्ले झाल्याचं महिलांनी सांगितलं. “माझे आई-वडील खूप वृद्ध आहेत. ते आजाराही आहेत. मी माझ्या १८ वर्षीय मुलीला अन्नाच्या शोधासाठी बाहेर पाठवू शकत नाही. त्यामुळे मी सैनिकांकडे गेले. अन्न मिळवण्याचा हाच एक मार्ग होता”, अशी हकिगत एका महिलेने दी गार्डियनला सांगितली.

हेही वाचा >> Who is Kamala Harris : आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या कमला हॅरिस यांचा भारताशी काय आहे संबंध? भारतीय मूल्यांशी कशी झाली ओळख?

सुदानमध्ये अर्ध्याहून अधिक लोकसंख्येची उपासमार

संयुक्त राष्ट्राच्या म्हणण्यांनुसार सुदानमधील संघर्षामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला असून १० लाखाहून अधिक नागरिकांना विस्थापित करण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात म्हटलंय की, जवळपास २६ लाख लोक म्हणजेच लोकसंख्येच्या अर्ध्याहून अधिक लोकांना अन्न संकटाचा सामना करावा लागत आहे. १५ एप्रिल २०२३ पासून येथील लष्कराकडून महिलांवर अत्याचार होत असल्याचे वृत्त सातत्याने समोर येत होते. आरएसएफच्या सैनिकांनी पद्धतशीरपणे लैंगिक हिंसाचार केले आहेत. खात्या खार्तूम परिसर आणि दारफुल या विस्तीर्ण पश्चिमेकडील प्रदेशात ही प्रकरणे अधिक झाली आहेत. हे परिसर आरएसएफकडून नियंत्रित केले जातात.

सैनिकांबरोबर संबंध ठेवल्यानंतर अन्न-पाण्याची होते सोय

लष्करातील सैनिकांबरोबर लैंगिक संबंध ठेवल्यानंतर एका महिलेला रिकाम्या घरातून अन्न, स्वयंपाकघरातील उपकरणे आणि परफ्युम घेण्याची परवानगी मिळाली होती. या रिकाम्या घरांमधून चोरी करण्याकरताही त्यांना सैनिकांबरोबर संबंध ठेवावे लागले होते. याबाबत ती महिला म्हणाली की, मी चोर नाहीय. मी ज्या परिस्थितीतून गेलेय ती मी शब्दांत सांगू शकत नाही. अशी परिस्थिती माझ्या शत्रूंवरही येऊ नये. माझ्या मुलांना खायला मिळावं याकरताच मी असं केलं”, अशी खंतही तिने बोलून दाखवली.

हेही वाचा >> शहीद जवान, नॉमिनेशन आणि वारसाहक्क…

सामाजिक संस्थांची मदत पोहोचलीच नाही

सुदानमधील अनेक भागात अन्नपुरवठा करण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. तर, संयुक्त राष्ट्राकडूनही अन्नपुरवठा वितरित केला जात असल्याचं म्हटलं आहे. परंतु,अशा कोणत्याही संस्था येथवर पोहोचल्याच नसल्याचं येथील महिलांनी सांगितलं. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी येथील महिलांवर चोरी-मारी करण्याची वेळ आली आहे. पण ही चोरीही त्यांना त्यांची अब्रू सैनिकांच्या हाती देऊन करावी लागतेय. येथील एका महिलेने लष्करातील सैनिकांबरोबर संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर तिच्यावर अतोनात अत्याचार करण्यात आले. दोघांनी तिचे पाय धरून तिला जाळण्याचा प्रयत्न केला.

लैंगिक अत्याचाऱ्यांचे आरोप फक्त महिलांनीच केलेले नाहीत, तर असे प्रकार घडत असल्याचं खुद्द सैनिक आणि येथील रहिवाशांनीही मान्य केल्याचं दी गार्डियनच्या वृत्तात म्हटलं आहे. एका सैनिकाने सांगितले की, त्याने वैयक्तिकरित्या कधीच महिलांचा गैरफायदा घेतलेला नसला तरी त्याने आपल्या सहकाऱ्यांना हे करताना पाहिले आहे. त्याने एका घटनेचे वर्णन करताना म्हटलंय की एका महिलेने सैनिकांसोबत लैंगिक संबंध ठेवले, ज्याने तिच्या बहिणींना घरे लुटण्याची परवानगी दिली. हे भयानक आहे.”

पश्चिम ओमदुरमन येथील एका रहिवाशाने सांगितले की, येथील रिकाम्या घराच्या बाहेर अनेक महिला रांगा लावून उभ्या असतात. सैनिक त्यांना आत येऊ देतात. या घरातून कधीकधी ओरडण्याचाही आवाज येतो, पण आम्ही काहीच करू शकत नाही”, अशीही हतबलता त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, या अशा कहाण्या वाचल्यानंतर युद्धात मोठ्या प्रमाणात नरसंहार होतो त्याप्रमाणे माणुसकीही खाक होते का, असाही प्रश्न पडतो.

१४ महिला गर्भवती

सुदानमध्ये घडलेल्या ७५ बलात्कारांच्या घटनांमध्ये १४ महिला गर्भवती राहिल्याचेही वृत्त सुदान ट्रिब्युन या संकेतस्थळाने दिले आहे. SIHA चे प्रादेशिक संचालक अल करिब यांनी सांगितलं की युद्ध सुरू झाल्यापासून देशभरात लैंगिक हिंसाचाराच्या २५० प्रकरणांचे दस्तऐवजीकरण केले आहे. यामध्ये डिसेंबर ते एप्रिल २०२४ च्या अखेरीस अल जझिराह राज्यातील ७५ प्रकरणांचा समावेश आहे.