टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीत प्रेम – ब्रेकअप- पॅचअप पुन्हा नंतर ब्रेकअप असे काहीसे चक्र अनेकदा पाहावयास मिळालंय. बऱ्याचदा सेलिब्रिटी सेटवर अगदी कमी वेळात एकमेकांच्या प्रेमात पडतात. काहीजण तर लग्नही करतात. पण नंतर एकमेकांना पुरेसा वेळ दिल्यावर त्यांना आपलं या व्यक्तीशी काही जमू शकत नाही, अशी अनुभूती येते. त्यामुळे ब्रेकअप किंवा घटस्फोट हे शेवटचे पर्याय त्यांच्याकडे उरतात. मात्र, एकेकाळी बॉलिवूडमध्ये ‘मेड फॉर इच अदर’ असे वाटणारी बिपाशा बासू आणि जॉन अब्राहम यांची जोडी तब्बल नऊ वर्षे एकत्र होती. हे दोघं लग्न करणार असल्याचे निश्चित असतानाच त्यांच्या ब्रेकअपचे वृत्त आले आणि अनेकांनाच धक्का बसला. ब्रेकअपनंतर बिपाशाने आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग स्वीकारत करण सिंग ग्रोवर याच्याशी लग्न केले तर जॉनने प्रिया रुंचल हिच्यासोबत संसार थाटला.

वाचा : Vivek Oberoi & Salman Khan controversy ‘माझ्याविरोधात फतवाच काढण्यात आला होता’

जॉनसोबतच्या ब्रेकअपबद्दल एका मुलाखतीत बिपाशा म्हणाली की, माझ्यासाठी हा ब्रेकअप काही आनंददायी नव्हता. खरंतर कोणताच ब्रेकअप शांततेत होत नाही. ब्रेकअपमागे नेहमीच काहीतरी कारण असते, असे नसते तर कोणाचेच ब्रेकअप झाले नसते. त्या नात्यासाठी मी सर्व गोष्टींचा त्याग केला होता. जणूकाही मी परिकथेत असल्यासारखेच वावरत होते. त्यावेळी मी किती वेडी होते, असा मी आता विचार करते. त्या नऊ वर्षांमध्ये मी माझ्या कामापासून लांब राहू लागले, समोर आलेल्या संधीही दवडल्या. मी प्रेम करत असलेल्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते, आमच्या नात्याला अधिकाधिक वेळ देता यावा म्हणून मी लोकांना भेटणंही टाळायचे. पण, मी केलेले सर्व प्रयत्न एका रात्रीत धुळीला मिळाले. सगळं संपलंय याची जाणीव होण्यासाठी मला बरेच महिने लागले. याचा मला प्रचंड त्रास झाला. त्यानंतर मी कोणालाच भेटत नव्हते, जणू अज्ञातवासात गेल्याप्रमाणे मी तेव्हा वावरत होते.

वाचा : वडिलांच्या मित्रांनी फेकलेली सिगारेट ओढायचा संजय दत्त

लग्नापूर्वी दिनो मोरिया आणि हर्मन बवेजा यांच्यासोबतही बिपाशाचे प्रेमसंबंध असल्याची तेव्हा चर्चा होती. अजूनही पूर्वाश्रमीच्या प्रियकरांसोबत तुझी मैत्री आहे का, असा सवाल केला असता ती म्हणाली की, ‘तुमच्या आयुष्यात आलेले त्या व्यक्ती जर चांगल्या असतील तर मैत्रीचं नातं जपायला काहीच हरकत नाही.’