‘देवयानी’ या मालिकमुळे संग्राम साळवी हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. या मालिकेतील ‘तुमच्यासाठी काय पण’ हा त्याचा संवाद चांगलाच गाजला होता. हाच अभिनेता लग्नबंधनात अडकला असून मराठी आणि हिंदी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू तावडेसोबत त्याने लग्नगाठ बांधली. सोमवारी हा लग्नसोहळा पार पडला आणि या सोहळ्याला टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये काम केलेल्या खुशबू आणि संग्रामचा हा प्रेमविवाह आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला होता. खुशबू केवळ मराठी इंडस्ट्रीतच नाही, तर हिंदी इंडस्ट्रीतदेखील तितकीच प्रसिद्ध आहे. ‘तेरे बीन’ या मालिकेतील तिच्या अभिनयाला विशेष पसंती मिळाली होती. चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेल्या ‘सांजबहर’मध्ये संग्राम आणि खुशबूने एकत्र काम केले होते. बहुदा तिथेच या दोघांची मनं जुळली असावीत. वाचा : 'त्या' चिमुकलीचे धाडस पाहून बिग बी भारावले संग्रामने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर हळदीच्या कार्यक्रमाचाही फोटो पोस्ट केला आहे. लग्नसोहळ्यातील त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सुयश टिळक, नम्रता आवटे, अभिज्ञा भावे, अमित कल्याणकर यांसारख्या बऱ्याच सेलिब्रिटींनी संग्राम आणि खुशबूच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.