गजेंद्र अहिरेंचा ‘द सायलेंस’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आपल्या भूतकाळात घडलेल्या घटनांचं ओझं संपूर्ण आयुष्यभर वाहणाऱ्या कैक चीनींचे मौन मोडणाऱ्या ‘द सायलेंस’ या चित्रपटाच्या निमित्ताने गजेंद्र अहिरेंशी मारलेल्या खास गप्पा :

१. तुमच्या चित्रपटाचं शीर्षक खूप वेगळं आहे. हा चित्रपट नेमका कशाशी निगडीत आहे?
– हा चित्रपट त्या व्यक्तींशी निगडीत आहे ज्या अन्यायाविरूध्द आवाज न उठवता आपल्या आयुष्याचा गाडा ओढत राहतात. कुंपणात दडून असलेल्या या समाजातील एक व्यक्ती दुष्कृत्याविरोधात उभी ठाकते आणि म्हणून या चित्रपटाचं नाव ‘द सायलेंस’ आहे.

२. चित्रपटाचं चित्रीकरण बरंच आधी होऊनही चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी एवढा अवकाश का?
– आम्ही अनेक राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये चित्रपटाचं स्क्रिनिंग केलं. या चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कारांबरोबरच ‘द सायलेंस’ने प्रेक्षकांची मनं ही जिंकली. आपलं वेगळेपण जगभरात गाजवल्यानंतर आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

वाचा : अरे, ही तर सोनाली कुलकर्णी!

३. अंजली पाटीलसोबत तुम्ही ‘सैराट’ फेम नागराज मंजुळेंची प्रमुख भूमिकेसाठी निवड केलीत. या निवड प्रक्रियेबद्दल काय सांगाल?
– तो माझा जवळचा मित्र आहे. केवळ ‘सैराट’ किंवा ‘फँड्री’चा दिग्दर्शक म्हणून नाही तर मला माझ्या चित्रपटासाठी एका प्रखर व्यक्तिमत्त्वाची गरज होती. जे नागराजमध्ये मी पाहिलं आणि त्याची या चित्रपटासाठी आम्ही निवड केली. अंजली एक खूप प्रतिभावान अभिनेत्री आहे, तिला माझ्यासोबत कामही करायची इच्छा होती आणि म्हणून या चित्रपटासाठी तिची निवड झाली.

४. चित्रपटात संगीत किती मह्त्त्वाचं आहे?
– गाणी या चित्रपटात नाहीत. पण, चित्रपटाची कथा पार्श्वसंगीतातून खुलून येते. या चित्रपटाला ‘इंडियन ओशन बँड’ने संगीत दिलं आहे.

वाचा : वैभव-प्रार्थनाचं लागणार ‘व्हॉट्सअप लग्न’

५. तुमच्या प्रत्येक चित्रपटात नेहमीच वेगळेपण जाणवतं. ते नेहमीच्या कथांपेक्षा वेगळे असतात. तुमच्याकडून हे ठरवून केलं जातं?
– मी एक कलात्मक व्यक्ती आहे. नेहमी होणाऱ्या चित्रपटांपेक्षा काहीतरी वेगळं करून पाहण्यात मला नेहमीच रस असतो.

६. आगामी चित्रपटांविषयी काय सांगाल?
– माझे ‘कुलकणी चौकातला देशपांडे’ आणि ‘ताच’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.