अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा खळबळजनक आरोप एका मुलाखतीत केला. सध्या कलावर्तुळात याविषयी जोरदार चर्चा असली तरी बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन आणि बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांनी बोलणं टाळलं आहे. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात बिग बी व आमिर खान यांना तनुश्रीने केलेल्या आरोपांवर प्रश्न विचारण्यात आला होता.

‘माझं नाव तनुश्री दत्ता किंवा नाना पाटेकर नाही, मग मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ शकतो?,’ असा प्रतिप्रश्नच बिग बींनी प्रसारमाध्यमांना केला. २००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केलं असा आरोप तनुश्रीनं एका मुलाखतीत केला. नाना पाटेकर यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केलं हे अनेकांनी पाहिलं पण कोणीही माझ्यामागे उभं राहिलं नाही, सगळ्यांनीच यावेळी केवळ बघ्याची भूमिका निभावली असंही ती म्हणाली.
या संपूर्ण प्रकरणावर आमिरनेही प्रतिक्रिया देणं टाळलं. ‘मला या संपूर्ण प्रकरणाची सत्यता माहित नाही. त्यामुळे यावर मी प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. पण अशा घटना घडणं अत्यंत दु:खद आहे,’ असं तो म्हणाला.

वाचा : सलमान खानच्या ‘लवयात्री’विरोधातील एफआयआरवर सुप्रीम कोर्टाची स्थगिती 

असभ्य वर्तन करणाऱ्या नानाविरुद्ध आवाज उठवल्यानंतर मनसेकडून त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा आरोपही तिनं केला. तनुश्रीच्या या आरोपांमुळे कलावर्तुळात तनुश्री विरुद्ध नाना असा वाद पेटला आहे.