चित्रपट आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये सक्रिय असणाऱ्या सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांनी आता सोशल मीडियावरही त्यांचं वर्चस्व सिद्ध करण्याच्या दिशेने पावलं उचलली आहेत. सध्याच्या घडीला सोशल मीडियाची व्याप्ती पाहता या अनोख्या माध्यमाच्या सहाय्याने आपल्या चाहत्यांशी आणि समर्थकांशी जोडलं जाण्यासाठी त्यांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर नव्याने एंट्री केली आहे. ट्विटरवर सक्रिय असणाऱ्या रजनीकांत यांनी ‘वनक्कम…’ करत घेतलेली ही ग्रँड एंट्री अनेकांनाच आश्चर्याचा धक्का देऊन गेली.

‘रजनीकांत’ याच नावाने त्यांचे इन्स्ट्ग्राम हॅंडल असून, त्यावरुन ‘कबाली’ या चित्रपटातील एका फोटोची पहिलीवहिली पोस्ट करण्यात आली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या या अकाऊंटवर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येत्या काळात ‘थलैवा’ यावरुन आणखी कोणत्या पोस्ट करतात याकडेच चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

वाचा : प्रिय आईस.. तू माझं सर्वस्व होतीस, जान्हवी कपूरने जागवल्या श्रीदेवींच्या आठवणी

काही दिवसांपूर्वीच रजनीकांत यांनी त्यांच्या राजकीय पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्या माध्यमातून तामिळनाडूच्या राजकारणात एक वेगळी क्रांती आणण्याचा त्यांचा मानस आहे. मुख्य म्हणजे राजकारण आणि आपली लोकप्रियता या सर्व मुद्द्यांचा अंदाज घेत जास्तीत जास्त लोकांशी जोडलं जाण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता येत्या काळात या नव्या दुनियेत सुपरस्टार ‘रजनी’ रुळणार का, आणि त्यांच्या नव्या रणनिती काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.