पैसा, आलिशान जगणं, प्रसिद्धी, यश या सर्व गोष्टी मिळूनही अनेकदा माणून सुखी नसतो. स्वप्नांच्या मागे पळता पळता काही गोष्टी मागेच राहून जातात. इच्छित स्थळी पोहोचण्यापेक्षा तिथपर्यंत कसे पोहोचलो हे महत्त्वाचं आहे असं म्हणतात. अभिनेता वरुण धवनला अशीच एक गोष्ट मनातल्या मनात छळतेय.

खरंतर कमी वयात वरुणला यश, प्रसिद्धी, पैसा या सर्व गोष्टी मिळत आहेत, तरीही तो दु:खी का आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र या गोष्टी मिळवण्याच्या प्रयत्नात आपल्या लोकांपासून दूर जात असल्याची भावना वरूणला स्वस्थ बसू देत नाहीये. एका मुलाखतीत त्याने ही खंत व्यक्त केली. ‘कुटुंबीयांसाठी, प्रिय व्यक्तींसाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर यापेक्षा वाईट कोणतीच गोष्ट या जगात नसेल. माझ्या आईवडिलांना वेळ देऊ शकत नाहीये, आजारी असलेल्या चुलत भावाला भेटू शकत नाहीये, या सर्व गोष्टी कुठेतरी मला मनात खूप छळत आहेत. एकीकडे मी लोकांच्या मनोरंजनासाठी काम करतोय आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतोय. त्या मोबदल्यात मला पैसा, प्रसिद्धी, यश या गोष्टी मिळत आहेत. पण हे यश म्हणजे दुधारी तलवार आहे. ती कायम जवळ बाळगणे कठीण आहे. शेवटी काही ना काही कमतरता राहून जातेच. मी आज कितीही मेहनत घेत असलो तरी मी अनेकांना पूर्णपणे समाधानी करू शकत नाही. मी केवळ यासाठी स्वत:ला नशीबवान मानतो की, माझ्यावर नि:स्वार्थ प्रेम करणारी काही माणसं माझ्याकडे आहेत. ते मला समजून घेतात,’ असं तो म्हणाला.

https://www.instagram.com/p/Bg5Mld_AvFc/

वाचा : कपिलकडून ‘ती’ चूक पुन्हा एकदा

वरुणच्या ‘जुडवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ‘ऑक्टोबर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ‘सुई धागा’ या चित्रपटातही तो मुख्य भूमिका साकारत आहे.