‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील ‘अक्षरा बहू’ तुम्हाला माहितच असेल. छोट्या पडद्यावर प्रचंड गाजलेल्या या मालिकेतून अभिनेत्री हिना खान घराघरात पोहोचली. मालिकेत हिनाने साकारलेली आदर्श सूनेची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. पाच महिन्यांपूर्वीच हिनाने ही मालिका सोडली आणि आता ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमधून ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतली आहे. पण मालिका सोडल्यानंतर पाच महिने हिना नेमकं काय करत होती हा प्रश्न अनेकांना पडला. यासंदर्भात ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केलाय.

या मुलाखतीत हिना म्हणाली की, ‘मालिकेच्या ८ वर्षांदरम्यान मी माझ्या कुटुंबियांना वेळ दिला नव्हता, तो मी त्या पाच महिन्यांमध्ये दिला. स्वत:ला वेळ देण्याला मी महत्त्व दिलं. मला नेमकं काय हवंय याचा विचार मी करत होते. माझ्या घरच्यांना त्यावेळी माझ्याबद्दल खूप काळजी वाटत होती. दिवसभर मी माझ्या बेडरुममध्येच असायचे, त्यामुळे मी बरी आहे ना असेच ते मला सारखं विचारत होते. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’नंतर काम करत नसल्याने मी नैराश्यात गेले असंच त्यांना वाटू लागलेलं.’

जाणून घ्या, प्रभासच्या ‘साहो’बद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी

मालिकेनंतर पाच महिने हिना घरीच असल्याने तिच्या कुटुंबियांना तिची चिंता वाटू लागली होती. याबद्दल ती पुढे म्हणाली की, ‘लाइट्स, कॅमेरा, अॅक्शन, लाऊड स्पीकर्स यांमध्ये मी ८ वर्ष राहिल्यानंतर मला स्वत:साठी वेळ द्यायचा होता. पण हे घरच्यांना समजावून सांगायला मला खूप वेळ लागला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेचच मला मालिकेची ऑफर मिळाली. त्यानंतर मालिकेदरम्यान मला इतर काहीच करायला वेळ मिळाला नाही.’ पाच महिन्यांच्या ब्रेकनंतर हिना खान सध्या स्पेनमध्ये ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमध्ये स्टंट्स करताना दिसतेय.