अभिनेत्री कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद काही थांबेना. रजत शर्मा यांना दिलेल्या मुलाखतीत कंगनाने हृतिकवर आरोप केले आणि तिथूनच हा सगळा वाद सुरू झाला. हृतिकनेही यावर आपले मौन सोडले असून, वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत बरेच खुलासे केले. या मुलाखतीत त्याने कंगनाचे सर्व आरोप फेटाळून लावले. इतक्यावरच न थांबता, हृतिकने आणखी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये पुन्हा एकदा त्याने कंगनाच्या वादावर भाष्य केले.

भुपेंद्र चौबे यांना दिलेल्या मुलाखतीत हृतिक म्हणाला की, ‘या वादावर स्पष्टीकरण मी नव्हे तर ज्या व्यक्तीने आरोप केले आहेत त्याने द्यावे. आरोप करणाऱ्याने पुरावेही द्यावे. हे असं झालं की, रस्त्याच्या एका बाजूला मी माझी गाडी उभी करावी आणि दुसऱ्या व्यक्तीने येऊन माझ्या गाडीला धडक द्यावी. यावर उलट मलाच प्रश्न विचारले जावे की, त्या व्यक्तीने तुझ्या गाडीला धडक का दिली? या प्रश्नांची उत्तरं मला माहिती नाहीत.’

वाचा : ‘पुरस्कार परतच करायचे असतील, तर मग स्वीकारता तरी कशाला?’

या संपू्र्ण वादावर इतके दिवस त्याने मौन का बाळगले, असाही प्रश्न त्याला विचारण्यात आला. ‘मी ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले त्यात चुका असू शकतात. पण मी स्वत:ला त्याचा दोष देत नाही,’ असे उत्तर त्याने दिले. कंगनामुळे पत्नी (पूर्वाश्रमीची) सुझान खानला घटस्फोट दिल्याच्या चर्चा खोटे असल्याचेही त्याने स्पष्ट केले. ‘सुझान यासंदर्भात नेहमीच माझ्याशी मोकळेपणाने बोलायची. पुरूषाने पत्नीला धोका दिला, म्हणूनच नाते टिकले नाही, असं म्हणत असाल तर हे चुकीचं आहे. पती-पत्नीच्या विभक्त होण्यामागे इतरही काही कारणे असू शकतात,’ असे तो म्हणाला.

वाचा : कंगनाची कहाणी एकतर्फी- फरहान

हृतिक-कंगनाच्या वादावर अनेकांनी आपली मते मांडली. अभिनेता फरहान अख्तरने फेसबुकवर खुले पत्र पोस्ट करत हृतिकला साथ दिली. कंगनाकडे कोणतेच पुरावे नसल्याची बाब फरहाननेही पोस्टमध्ये मांडली होती. आता कंगना यावर काय उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.